डोंबिवली : डोंबिवलीकरांच्या जिवाची घालमेल वाढविणारी औद्योगिक विकास महामंडळाची ४८ तासांची पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाने बुधवार १ जुलै ते शुक्रवार ३ जुलै या कालावधीत सलग दोन दिवस म्हणजेच ४८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना जारी केली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्य रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. मात्र, आता हीच सूचना रद्द करण्यात आल्याने डोंबिवलीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
१९ जून रोजी जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून १ जुलै ते ३ जुलै दरम्यान ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची सूचना औद्योगिक विकास महामंडळाने दिली होती.
यापूर्वी २४ तासांची पाणीकपात केली जात होती. मात्र यंदा सलग दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याने रहिवासी आणि उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच दरम्यान पाणी कपात रद्द झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि सर्वसामान्य डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळाला असून पावसाने अशीच साथ दिली तर पुढील काळात पाणीकपातीचे संकट टळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
रहिवाशांचा दबाव अन् पावसाची साथ : महामंडळ नरमले
सलग ४८ तास पाणीकपात करू नये, यासाठी निवासी विभागातील १०२ रहिवाशांनी २९ जून रोजी सह्यांचे निवेदन औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यातच आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रहिवाशांचा रोष आणि पावसाची सुरूवात या दोन्ही बाबींचा विचार करून महामंडळाने गुरूवारी व शुक्रवारी होणारी ४८ तासांची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी जाहीर केली.
रहिवाश्यांच्या एकजुटीचा विजय - राजू नलावडे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सलग ४८ तास पाणीकपात रद्द झाली, ही रहिवाश्यांच्या एकजुटीची ताकद आहे. महामंडळाने रहिवाशांची भावना समजून घेतली, प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला आणि रहिवाशांनीही संघटितपणे निवेदन दिले. त्यामुळेच हा निर्णय मागे घेण्यात आला. यासाठी महामंडळ, प्रसारमाध्यमे आणि सर्व नागरिकांचे मनापासून आभार, अशा शब्दांत राजू नलावडे यांनी प्रतिक्रिया दिली.