शहापूर : राजेश जागरे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शहापूर तालुक्यातील रस्ते मार्ग क्रमांक 56 व 58 तसेच इतर मार्गांवर बसविण्यात आलेले दिशादर्शक फलक अज्ञात भंगार चोरांच्या रडारवर आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील काही दिवसांत तालुक्यातील विविध मार्गांवरील अनेक फलक उखडून नेल्याचे वास्तव आहे. परिणामी वाहनचालकांना मार्गदर्शनाचा अभाव जाणवत असून या रस्त्यांवर अपघाताचा धोका वाढला आहे.
शहापूर तालुक्यातील रस्ते मार्ग क्रमांक 56 म्हणजेच धसई फाटा ते सारंगपुरी-कोठेरा, रस्ते मार्ग क्रमांक 58 म्हणजेच भातसानगर फाटा बिरवाडी-भातसानगर, शेंद्रुण फाटा ते बावघर-मासवणे- शेई- शेरा-वाशिंद या रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी फलकांचे लोखंडी खांब आणि पत्रे कापून व उपटून नेले जात आहेत. तत्पूर्वी ते खांब वाकवले जातात व रात्रीच्या सुमारास ते चोरून नेले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी फलकांचे अवशेषच उरले असून काही ठिकाणी पूर्णपणे गायब झाले आहेत.
विशेषतः बाहेरील वाहनचालक व आपत्कालीन सेवांना योग्य मार्ग शोधण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहापूर उपअभियंता बलवंत कांबळे यांचेशी चर्चा करुन वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. परिणामी संबंधित यंत्रणेकडून तातडीने दखल घेतली गेली नसल्याने भंगार चोरांना सुगीचे दिवस आले आहेत. किंबहुना रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने दिशादर्शक फलक अत्यावश्यक असल्याने त्यांची देखभाल, नियमित तपासणी व संरक्षणासाठी ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी
सीसीटीव्ही निरीक्षण, रात्रीची गस्त आणि फलकांचे मजबूत बांधकाम यांसारख्या उपायांचा विचार करण्याची सूचना स्थानिकांनी केली आहे. दरम्यान शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेची चौकशी करून चोरीला गेलेले फलक तातडीने पुनर्स्थापित करावेत तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस सुरक्षा व्यवस्था उभारावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्त्यांवरील दिशादर्शक फलक चोरीला जाणे चिंताजनक आहे. हे फलक नागरिकांच्या व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीसाठी महत्त्वाचे असतात. या प्रकरणाची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करु. तसेच जे कोणी हे शासनाचे फलक भंगार म्हणुन विकत घेत असतील त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करण्यात येईल.बळवंत कांबळे, उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.