कल्याण : कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकार्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली.
शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत, याचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. केडीएमसी आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. तर रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे, आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या. तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, कैलास पनवेलकर, सचिन पोपलाइतकर, रोहन पोवार, कपिल पवार, गणेश लांडगे, रोहन आक्केवार, संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण पूर्व पश्चिम येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्व-पश्चिममध्ये अनेक गगनचुंबी बांधकामे सुरू आहेत. तेथे बांधकामासाठी जे पाणी साचवले जाते. त्यात डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असतो.
अनेक हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे तसेच मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नालेसफाई तसेच गटार सफाई झाली नाही. अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. या अशा अनेक कारणांमुळे डेंग्यूचा संसर्ग तसेच मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नाकारता येत नाही.
डेंग्यू संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात त्वरित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी. साचलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण व नाल्याची साफसफाई तसेच कचर्याची विल्हेवाट दररोज करावी. घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिरे व रक्त तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असल्यास तात्पुरत्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आल्या.