ठाणे: वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव परिसरात शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत केला. उसने दिलेल्या पैशांची परतफेड मागितल्याच्या रागातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
27 मे रोजी दहागाव येथील मोकळ्या मैदानालगतच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हात-पाय व डोळे बांधलेले होते, तर शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी भेट देत तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.
पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची छाननी केली. तपासादरम्यान मृताची ओळख शमशाद अली वारीश अली (वय 35, रा. काजूपाडा, कुर्ला) अशी पटली.
त्यानंतर पोलिसांनी संशयित सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशहा (38) आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर (43) यांना ताब्यात घेतले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. शमशाद अली यांनी सय्यद हसन याला उसने पैसे दिले होते.
पैशांची परतफेड होत नसल्याने शमशाद सातत्याने तगादा लावत होता. याच रागातून सय्यद हसनने साथीदार समीर कल्याणकरच्या मदतीने शमशादला वाशिंदमधील दहागाव येथे बोलावून घेतले. तेथे त्याचे हात-पाय बांधून धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा अवघ्या 48 तासांत छडा लावत आरोपींना अटक करण्यात ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.