आसनगाव : शहापूर तालुक्यात ३० जूनच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शहापूर तालुक्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही महत्त्वाची धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या २४ तासांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणांतील जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
जूनअखेरीस अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबतची भीती कमी झाली आहे.