चिखलोली धरण ७५ टक्के भरले pudhari photo
ठाणे

Chikhloli Dam : चिखलोली धरण ७५ टक्के भरले

समाधानकारक पाणीसाठ्याने शहरातील पाणीकपात रद्द

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : मागील चार दिवसांपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसाने येथील चिखलोली धरण तब्बल ७५ टक्के भरले आहे. या समाधानकारक पाणी साठ्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळवले आहे. पाणी कपात रद्द झाल्याने अंबरनाथकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे चिखलोली धरणातील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे मजीप्राने सुरुवातीला २९ मे पासून दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १५ जूनपासून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू केली होती. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा देखील काही भागांमध्येही एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आले होते.

त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील जागृती गल्ली, वडवली, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी, मंगलमूर्ती सोसायटी, बी-कॅबिन रोड, एमआयडीसी परिसर, नवरे नगरचा काही भाग, महालक्ष्मी नगर आणि आंबेडकर नगर या परिसरांतील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. मात्र आता समाधानकारक पाऊस झाल्याने व ७५ टक्के चिखलोली धरण भरल्याने पाणी कपात रद्द करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चिखलोली धरणातून शहराच्या पूर्व भागातील तब्बल ५० हजार लोकवस्ती ला दररोज ६ एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT