भिवंडी: भिवंडी शहर आणि तालुक्यातून १३ ते १८ जुलै रोजी दरम्यानच्या सहा दिवसांत पाच अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये चार अल्पवयीन मुलींसह एका मुलाचा समावेश आहे.
पहिल्या घटनेत शहरातील अन्सार नगर परिसरातील १६ आणि १४ वर्षीय ह्या दोन मुली १८ जुलै रोजी घरातून बाहेर गेल्या असता घरी परतलेल्या नाही. त्यामुळे दोघींचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या घटनेत नागाव हद्दीतील सलामतपुरा येथील १६ वर्षीय मुलगी घरातून बाहेर गेली असता अज्ञात व्यक्तीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिचे अपहरण केले आहे. या दोन्ही घटने प्रकरणी अज्ञात इसमांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत १३ जुलै रोजी शहरातील मामा भांजा दर्गा या ठिकाणी १२ वर्षीय मुलगा भीक मागण्यासाठी बसला असता तो घरी परतलेला नाही. त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून निजामपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चौथ्या घटनेत तालुक्यातील नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलगी कामावरचे पैसे घेवून येते असे सांगून घरातून १७ जुलै रोजी बाहेर गेली असता तिने मोठ्या बहिणीला फोन करून गावाला जाते असे सांगून गेली असता घरी परतली नसल्याने तिचे अपहरण केल्याच्या संशयावरून आईच्या तक्रारीवरून नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.