डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या हे धरण सुमारे ७९ टक्के भरले आहे.
मात्र धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची काही प्रमाणात गळती सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र गळतीमुळे धरणाला यत्किंचितही धोका नसल्याचा एमआयडीसी प्रशासनाने दावा केला आहे.
साधारणतः चार दरवाज्यांमधून गळती सुरू असून त्यातील दोन दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहताना दिसत आहे. याची तातडीने दुरुस्ती केली जाईल आणि दरवाजे तसेच धरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मात्र एल निनोच्या काळात पावसाबाबत अनिश्चितता असताना याकडे आधी का दुर्लक्ष करण्यात आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाची उभारणी केली.
१९७२ मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये धरणाचे शेवटचे विस्तारीकरण करण्यात आले. या विस्तारीकरणानंतर बारवी धरणाची पाणी साठवण क्षमता ३४०.४८ दशलक्ष घनमीटर झाली. यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करून विस्थापनही
करावे लागले. मात्र त्यामुळे बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी पुढे उल्हास नदीला येऊन मिळते. येथील जांभूळपाडा बंधाऱ्यावरून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते.
पावसाळ्यात बारवीच्या प्रवाहात आणि उल्हास नदीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर येते. अशावेळी धरणातून पाणी सोडण्याची गरज नसते. त्यामुळे आता वाया जाणारे पाणी अनावश्यक असून ते रोखण्याची मागणी होत आहे. या संदर्भात
एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तांत्रिक बाब असून स्वयंचलित दरवाज्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल. दरवर्षी थोडीफार गळती होत असते. हा देखभाल/दुरुस्तीचा भाग आहे.
याचा धरणाच्या किंवा दरवाज्यांच्या सुरक्षेशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बारवी धरणाच्या पाण्याची पातळी ७०.०६ मीटर नोंदविण्यात आली. धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे.
गळतीमुळे चिंता वाढली
बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच जिल्ह्याची वर्षभराची तहान भागवली जाते. त्यामुळे या धरणाच्या पूर्ण क्षमतेने भरण्याकडे प्रशासनासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले असते. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे अजूनही धरण पूर्ण भरले नाही.
अशातच धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून पाणी गळती होत असल्याचे दिसून आल्याने चिंता वाढली आहे. धरणाच्या चार दरवाज्यांमधून पाणी गळत असून त्यातील दोन दरवाज्यांमधून पाण्याचा प्रवाह अधिक आहे. तर दोन दरवाज्यांमधून किरकोळ पाणी वाहत आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी धरणातून बाहेर जात आहे. एकीकडे धरण भरण्याकडे सर्वांचे लक्ष असताना अशा स्थितीत गळती होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. अशीच गळती सलग सुरू राहिल्यास लाखो लिटर पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे.