डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडिवली-ढोकळी गावात काका ढाब्याजवळील दोनवेगवेगळ्या गृहसंकुलातून क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटने दोन बांग्लादेशी महिलांसह या महिलांना आश्रय देणाऱ्या दोन रहिवाशांना गुरूवारी (दि.6) रोजी अटक केली आहे.
पारपत्र आणि व्हिसा जवळ नसतानाही या बांग्लादेशी महिला भारतात बेकायदा राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने क्राईम ब्रँचने या बांग्लादेशी महिलांसह त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही अटकेची कारवाई केली आहे.
फरजाना शिरागुल शेख (36, रा. चांदुरे, जिल्हा - सातखिरा, बांग्लादेश) आणि बिथी उर्फ प्रिया नूरइस्लाम अख्तर (24, रा. गुलीस्तान, जिल्हा - ढाका, बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी महिलांची नावे आहेत. या महिला कल्याण पूर्वेकडे आडिवली-ढोकळी गावातील राजाराम पाटील नगरमधील साईयोग रेसिडेन्सी आणि गणेशनगर मधील स्वस्तिक विहार इमारतीत राहत होत्या. साईयोग रेसिडेन्सीमध्ये फरजाना शेख यांना ताहीर मुनीर अहमद खान (35), प्रिया अख्तर (32) यांना गणेश चंद्रा दास (37) यांनी स्वस्तिक विहार इमारतीत आश्रय दिला होता.
कल्याण पूर्वेत दोन बांग्लादेशी महिला भारतात वास्तव्याचे पारपत्र आणि व्हिसाविना राहत असल्याची माहिती खासगी गुप्तहेरांकडून क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटला मिळाली होती. या पथकाने गुरूवारी (दि.6) बांग्लादेशी महिला राहत असलेल्या इमारतीत छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतात निवासाचे पारपत्र आणि व्हिसाची मागणी केली. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. या महिलांना ताहीर खान, गणेश दास आश्रय देत असल्याचे क्राईम ब्रँचला आढळले.
भारतात विना परवाना राहत असल्याने क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिटचे हवालदार प्रसाद तोंडलीकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात चारही जणांना गुन्हा नोंदवून अटक केली.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
गेल्या सहा महिन्यात कल्याण-डोंबिवलीतून पोलिसांनी वीसहून अधिक बांग्लादेशी घुसखोरांना अटक केली आहे. बहुतांशी घुसखोर बांग्लादेशी पुरूष मजुरी, तर काही चालक म्हणून काम करत असल्याचे, तसेच महिला हाॅटेल, बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.