बदलापूर : दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक केल्यानंतर पहिल्यांदा न्यायालयाने तीन दिवसांचे कोठडी सुनावली होती. त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या एसआयटीने पोलीस कोठडी वाढवून देण्याचे मागणी केल्यानंतर अक्षय शिंदे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती. आज ही पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी सकाळीच अक्षय शिंदे याला मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. प्रियेश जाधव यांनी अत्याचार ग्रस्तचिमुरडींच्या पालकांचे वकीलपत्र घेतले असून या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कोर्टाकडे पोक्सो अॅक्ट कलम 6 आणि 10 अधिक कलम वाढवण्याची केलेली विनंती कोर्टाने मान्य केल्याचेही अॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले.
बदलापुरात पुकारलेल्या 21 तारखेच्या बंद दरम्यान बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 70 हून अधिक आरोपींना जामीन मिळाल्याची माहिती अॅड. प्रियेश जाधव आणि अॅड. प्रवीण अटकळे यांनी दिली. बदलापुरातील अटक झालेल्या आंदोलकांना बदलापूर आणि परिसरातील वकिलांनी मोफत वकीलपत्र घेऊन त्यांना कायदेशीर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्याचारप्रकरणी बदलापूर येथील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सेक्रेटरी तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका आठवले यांच्या विरोधात पोलिसांनी अक्षय शिंदेच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करताना पाहिजेत आरोपींमध्ये या तिघांचा समावेश केला आहे. एसआयटीकडे हा तपास असल्यामुळे आता या प्रकरणात एसआयटीने प्राथमिक जबाब नोंदवल्यानंतर या गुन्ह्यामध्ये पोस्को कलम 21 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवार (दि.27) पुन्हा न्यायालयात नराधम अक्षय शिंदे याचा रिमांड संपल्यामुळे पोलिसांनी या प्रकारात काही कलम वाढवण्याची मागणी कल्याण सत्र न्यायालयाकडे केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य करत कलम पोस्को कलम 6 आणि पोस्को कलम 10 चाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या अधिपत्याखाली हा तपास होत असल्याने आता या प्रकरणाशी संबंधित विविध घटकातील आरोपींना चौकशीअंती अटक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणातील संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि मुख्याध्यापिका या तिघांवर पहिल्या टप्प्यात पोलीसांनी पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये समावेश केल्यामुळे लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित संस्थाचालकांचेही जबाब नोंदवण्याचे काम एसआयटीकडून करण्यात येत असून त्यांच्यावरही अटकेची तलवार कायम आहे.