Alu Leaves Price Pudhari
ठाणे

Alu Leaves Price: पावसाच्या तुटकतेमुळे अळूच्या पानांची वाढ खुंटली; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाकाहारीप्रेमींची हिरमोड

पावसाच्या तुटकतेमुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अळूच्या पानांच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढारी वृत्तसेवा

सुमित घरत

भिवंडी: ठाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये खाण्यासाठी हिरव्या पानाचे सोने म्हणून ओळख असलेल्या अळू (पाटवडी) पानांची वाढ खुंटली आहे. यामुळे अळूवडी, अळूची भाजी आदी खाणाऱ्या शाकाहारीप्रेमींचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अळूची हिरवी ५ ते ६ पाने प्रमाणे पाटवडी पानांची जुडी २० रुपयांना बाजारात विकली जात आहे; परंतु पावसाच्या तुटकतेमुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अळूच्या पानांच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मान्सूनच्या असक्रियतेचे परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान गणेशोत्सव सणाला अवघे काही दिवस उरलेले असताना पाटवडी प्रेमींची हिरमोड होणार असल्याची चर्चा सद्यस्थितीत रंगत आहे. विशेष म्हणजे या अळूच्या पानांच्या मुळी पिकाला उष्ण, दमट हवामान आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी पण सतत ओलावा असलेली जमीन मानवते; परंतु हवामानातील बदल, तापमानात अचानक झालेली वाढ आणि कमी आर्द्रतेमुळे यावर्षी पानांचा आकार लहान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तसेच जमिनीत नत्राची कमतरता असल्यास पाने पिवळी पडून पानांची वाढ थांबत असल्याची उपयुक्त माहितीही कृषी विभागाकडून देण्यात आली. तर नैसर्गिक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि पानांच्या जोमदार वाढीसाठी जीवामृताचा नियमित वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला असून बुरशीजन्य रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जमिनीत ट्रायकोडर्मा मिसळण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

मान्सूनचा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगल्या टक्क्याने हजेरी लावल्याने काही प्रमाणात बळीराजा सुखावला तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. पावसाच्या तुटकतेचा परिणाम भाजीपाल्यावरही झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

शाकाहारीप्रेमींच्या खिशाला कात्री

विशेष म्हणजे अल निनोचा प्रभाव आणि त्यामुळे झालेली मान्सूनच्या असक्रियतेमुळे करटुले भाजीने ३०० रुपये प्रति किलोचा विक्रमी आकडा गाठलेला असताना ऐन श्रावणात औषधी गुणधर्मांनी नटलेली करटूले खाण्यासाठी शाकाहारी प्रेमींच्या खिशाला कात्री लागत आहे.

आगामी गणेशोत्सवाच्यापार्श्वभूमीवर पत्रावळीत हमखास तोंडाला चव आणणारी पाटवडी पानांची वाढ खुंटल्याचे ठाणे, पालघर जिल्ह्यातील ग्रामीणमधून दिसून येत आहे. तर पावसाची स्थिती अशीच राहिल्यास भातपिकांची वाढही खुंटणार, यात कुठलेही दुमत नाही. अशातच येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा मान्सून सक्रियतेच्या प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT