सापाड : योगेश गोडे
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाई स्वच्छतेच्या कामांना वेग दिल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमधील ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. कल्याण पूर्व परिसरातील वालधुनी नदी परिसरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
वालधुनी नदीतून काढलेला गाळ नदीच्या काठावरच टाकून ठेवण्यात आल्याने येणाऱ्या मुसळधार पावसात हा सर्व गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेच्या नावाखाली सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे काम केवळ कागदोपत्रीच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईसाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
शहरातील मोठे नाले, लहान गटारे तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याची जबाबदारी विविध ठेकेदारांना देण्यात आली आहे. पावसाळ्यात पाणी तुंबू नये आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र वालधुनी नदी परिसरात दिसत अस लेले वास्तव प्रशासनाच्या दाव्याला छेद देणारे आहे. वालधुनी नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला जात आहे. मात्र हा गाळ तत्काळ उचलून अन्यत्र टाकण्याऐवजी नदीच्या काठावरच ढिगाऱ्यांच्या स्वरूपात साचून ठेवण्यात आला आहे.
उन्हाळ्यात हा गाळ कोरडा दिसत असला तरी पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर तो पुन्हा नदीत मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेसाठी करण्यात आलेले संपूर्ण काम व्यर्थ जाणार असल्याचे पर्यावरणप्रेमी स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवलीतील नालेसफाईची कामे ठेकेदाराकडून फोटोसेशन आणि कागदोपत्री काम पूर्ण दाखवण्यासाठी सुरू आहे.
प्रत्यक्षात नाले आणि नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक तसेच गाळ योग्य पद्धतीने हटवला जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गाळ काढल्यानंतर तो आठवड्यांपर्यंत तसाच पडून राहत असल्याचे चित्र आहे. परिणामी दुर्गंधी, डासांचे प्रमाण आणि प्रदूषणातही वाढ होत आहे.
वालधुनी नदी ही कल्याण पूर्व परिसरातील महत्त्वाची जलवाहिनी मानली जाते. या नदीमार्गे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. नदीचे पात्र अरुंद होणे, गाळ साचणे आणि अतिक्रमण यामुळे दरवर्षी परिसरात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नदी स्वच्छतेचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र अशा निष्काळजी पद्धतीने काम होत असल्यास भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात न आहे.
नदीतील गाळ बाहेर काढणे हा केवळ पहिला टप्पा असतो. त्यानंतर व तो गाळ वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून सुरक्षित ठिकाणी हलवणे वे आवश्यक असते. मात्र अनेक वेळा खर्च वाचवण्यासाठी किंवा काम लवकर पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी व ठेकेदार गाळ नदीकाठावरच टाकून देतात. यामुळे पहिल्याच पावसात तो पुन्हा नदीत मिसळतो आणि नदी अ पूर्ववत गाळाने भरून जाते. परिणामी व प्रशासनाने केलेला खर्च पाण्यात अ जातो. अनेक नाल्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कचरा घ आणि गाळ साचलेला दिसत आहे. व नाले पूर्णपणे साफ नाहीत.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या कामांवर पालिका अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकारी घटनास्थळी येत नसल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचे सांगितले जात आहे. नालेसफाई दाखवण्यासाठी केवळ वरवरची साफसफाई केली जात असल्याचा आरोप देखील स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे.