नूतन बांदेकर
मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत, ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरणारे आणखी दोन घटक, जे परस्परांशी संबंधित आहेत. ते म्हणजे शेती आणि पशुपालन. हे दोन्ही व्यवसाय मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न आणि ते देणारी शेती आणि तिचाच जोडधंदा समजला जाणारे पशुपालन, दोन्ही उद्योग पूर्वापार चालत आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, हे कसे काय ग्लोबल वार्मिंगला आमंत्रण देत असतील?
जगाची वाढलेली लोकसंख्या आणि तिची पुरेशा अन्नाची मागणी यामुळे जंगलतोड करून ती जमीन शेतीसाठी वापरात आली. त्यामुळे ऑक्सिजन हब क्षेत्र कमी झाले. तसेच कमी जागेत, कमी वेळेत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्याचे संशोधन होत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जाऊ लागला. नवनवीन प्रयोग करत, जास्त उत्पन्न देणारे बियाणे, त्यासाठी रासायनिक खतांचा वापर, विषारी कीटकनाशकांचा वापर या सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर पडणारे, खतांमधील नायट्रोजन/फॉस्फरससारखे घातक वायू हवेचे प्रदूषण तर करतातच, त्याचबरोबर तापमान वाढीस कारणीभूत ठरतात.
मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. शेतीतील कचरा जाळल्यामुळे जे धुरके निर्माण होते, त्यामुळे देखील हवेचे प्रदूषण व वातावरणातील उष्णता वाढ मोठ्या प्रमाणात होते. शेतीमध्ये होणाऱ्या नांगरणी, कापणी आणि इतर शेती विषयक कामांसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टरसारखी अनेक यंत्रे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवेतील प्रदूषण वाढते.ही उष्णता हानिकारक हरितगृह वायू उत्सर्जित करतात, परिणामी जागतिक तापमानात वाढ होत आहे.
शिवाय, खत घातलेली जमीन नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया यांसारखी कार्बन आणि नायट्रोजन आधारित संयुगे म्हणजे संभाव्य हरितगृह वायू उत्सर्जित करतात. याव्यतिरिक्त जमिनीतील काही जैवरासायनिक प्रक्रिया नैसर्गिकरित्या अनेक हरितगृह वायू उत्सर्जित करतात. प्राण्यांच्या विष्ठेतील रोगकारक घटक आणि कीटकनाशकांचे अवशेष यांचा देखील समावेश होतो.मंडळी, या सगळ्यावर उपाय म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेती आणि पशुपालन या व्यवसायांद्वारे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणासंबंधी प्रभावी धोरणांमध्ये जमिनीची धूप कमी करण्यासाठी नांगरणी, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि वाहून जाणारे पाणी कमी करण्यासाठी सुधारित खत व्यवस्थापन यांचा समावेश होतो.
शेतीमुळे होणाऱ्या प्रदूषणावरील उपायांमध्ये शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे व्यवस्थापन करणे आणि रासायनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याऐवजी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे यांचा समावेश होतो.एनआयएएनपी, बंगळुरूच्या विभाग प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, जुन्या काळात पशुंचा आहारसुद्धा मानवाप्रमाणे संतुलित होता व त्यात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण अधिक होते. आता मात्र आहार पद्धत बदलली आहे, ज्यामुळे उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.
केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारच्या विभागांना नियोजनाबाबत पत्र दिले आहे. मात्र, हवी तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जनावरांचे मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय पशुपोषण व शरीर विज्ञान संस्थेने राबविलेल्या ‘हरितधरा प्राद्योगिकी’ प्रकल्पामध्ये ‘फायटो सप्लिमेंट’ नावाचे औषध तयार केले आहे. दररोज 200 ते 250 ग्रॅम पावडर पशुंना दिली जाते. ज्यामुळे पशुचे मिथेन उत्सर्जन 20 ते 25 टक्के कमी होते.2 डिसेंबर रोजी पाळला जाणाऱ्या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने वायू प्रदूषण, त्याची विविध कारणे, त्याचे होणारे परिणाम, हरितगृह वायूवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना यांची चर्चा होणे गरजेचे आहे. त्यांची आकडेवारी जाहीर होणे.त्याचे गांभीर्य लक्षात आणून देणे, व जनजागृती उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
दिल्ली आणि पाटणा यांसारख्या प्रमुख भारतीय शहरांना आसपासच्या कृषी कार्यांमुळे उच्च प्रदूषणाच्या पातळीचा सामना करावा लागतो. भारतातील हरितगृह वायू उत्सर्जन आणि वायू प्रदूषणामध्ये कृषी क्षेत्राचे योगदान पुढीलप्रमाणे आहे.
पशुधन मिथेन : भारतात पशुधन हे सर्वात मोठे मिथेन उत्सर्जक (146%) आहे, त्यामध्ये प्रामुख्याने गायी-म्हशींच्या आतड्यांतील किण्वन प्रक्रियेद्वारे मिथेन तयार होतो.
खते आणि भात : नायट्रोजनयुक्त खतांमुळे संभाव्य चे 19% उत्सर्जन होते, तर भातशेतीमुळे सदृश वायूंचे 17.5% उत्सर्जन होते. पिकांचे अवशेष जाळणे: भारतात दरवर्षी 50 कोटी टन पिकांचे अवशेष निर्माण होतात, त्यापैकी 92 कोटी टन पीक अवशेष जाळले जातात, ज्यामुळे प्रामुख्याने उत्तर भारतातील वायुप्रदूषणात लक्षणीय वाढ होते.
मातीची धूळ : नांगरणी आणि कापणीमुळे मातीची धूळ निर्माण होते, ज्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते आणि हवेची गुणवत्ता व सार्वजनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
प्रदूषणाचे स्रोत : प्रत्यक्ष शेतीव्यतिरिक्त, औद्योगिक उत्सर्जन (कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड), वाहनांचे उत्सर्जन आणि लँडफिलसारख्या अयोग्य अशा कचरा व्यवस्थापनातून हवेचे प्रदूषण होते.