ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मेट्रोचे काम सुरु असताना जवळपास ३० फूट उंचीवरून पडून कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी (दि. ६) घडली. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. तर स्पॉटवर असलेल्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांवरही या प्रकारामुळे नागरिक संतापले आहेत.
घाटकोपर ते वडवली हा मेट्रो-४ मार्ग ठाणे शहरातून जात असून ठाण्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन हात नाका परिसरातून मेट्रोला प्रवेश देण्यात आला आहे. ठाण्यात मेट्रोचे कामही प्रगतीपथावर आहे. तीन हात नाका परिसरात मेट्रोचे पहिले स्थानक असून या ठिकाणी मोठे खांब उभारण्यात आले आहे. याच खांबावरून ३० फूट उंचावरून पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कामगार रस्त्यावर पडल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात होऊन देखील घटनास्थळी मेट्रो अधिकाऱ्यांपैकी कोणीच लवकर न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.