ठाणे: गेल्या दोन वर्षात आश्रमशाळेतील ५८४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे राज्यात रान उठले आहे. या पाठीमागे आश्रमशाळेतील गैरसोयी व आरोग्य विषयक समस्यांकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. आश्रमशाळा या कोंडवाडे झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहात आहे.
अनेक आश्रमशाळा नादुरुस्त असून दुरुस्तीला निधी नाही. पत्र्याच्या शेडमध्ये आश्रमशाळा असून पालघर जिल्ह्यातील तीन आश्रमशाळांतील पत्रे उडाल्याने विद्यार्थ्यांना राहण्यासाठीही जागा उपलब्ध नव्हती. प्रामुख्याने तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड भागात आश्रमशाळेतील स्थिती बिकट आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांना माओवादी कारवायांमुळे या सर्वेक्षणातून वगळले होते. यामधून आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्यव पायाभूत सुविधांचा सर्वाधिक अभाव असल्याचे समोर आले आहे. राज्यातील आश्रमशाळांत गंभीर आजारामुळे २७३ मृत्यू झाले आहेत.
सर्वाधिक मृत्यू हे आजारपणामुळे झाले आहेत. यात ताप, अन्न विषबाधा, सिकलसेल, कुपोषण व इतर संसर्गजन्य आजारांचा समावेश आहे. यात सरकारी आश्रमशाळांतील १८२ तर अनुदानित आश्रमशाळांतील ९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आश्रमशाळांसाठी जेवण पुरविणारे ठेकेदार हे बरेचदा शिळे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये फूड पॉयझन झाल्याचे पुढे आले. आश्रमशाळांमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याने नैराश्येतून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५५ एवढी आहे. विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन न होणे तसेच त्यांच्यामध्ये आलेले नैराश्य दूर न होणे, अशा कारणामुळेही हे मृत्यू झाले आहेत.
गळफास लावून विद्यार्थ्यांनी मृत्यूचा मार्ग स्वीकारला, यामध्ये सरकारी आश्रमशाळांमधील २५ तर अनुदानित आश्रमशाळांमधील ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्पदंश आणि विंचूदंश यामुळे २८ मृत्यू झाले आहेत.
यामधील सरकारी शाळांमध्ये २२ आणि अनुदानित आश्रमशाळांमधील ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने जंगल भागांमध्ये असलेल्या आश्रम शाळांमध्ये योग्य चांगल्या दर्जाच्या इमारती नसल्याने हा प्रश्न उद्भवत आहे. एकूण झालेल्या मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे शाळेच्या आवारात तर ५४८ मृत्यू हे सुट्टीत घरी असताना किंवा रुग्णालयात उपचार घेताना झाले आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत.
२२८ मृत्यू हे विविध अपघातांमुळे झाल्याचे निष्पन्न
अपघातामध्येही मृत्यू होण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. एकूण २२८ मृत्यू हे अपघातांमुळे झाल्याचे पुढे आले आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना बाहेर पाठवताना प्रवासाची योग्य काळजी घेतली जात नसल्याने हे अपघाती मृत्यू होताना दिसतात. यामध्ये रस्ते अपघात आणि तलाव, पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. यात सरकारी आश्रमशाळांतील १५५ तर अनुदानित आश्रमशाळांतील ७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.