ठाणे : राज्य सरकारने महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50 टक्के सवलत या योजना विशेष स्वरूपाच्या आहेत. मात्र, एसटी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
सरनाईक हे धाराशिव दौर्यावर आले असता पत्रकारांनी महिलांच्या एसटी सवलतीबाबत प्रश्न विचारला. ते म्हणाले, महिलांना देण्यात आलेल्या 50 टक्के सवलतीमुळे एसटी महामंडळाला रोज 3 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे येथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला एसटी प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही. राज्य सरकारने यापूर्वीच महिलांसाठी 50 टक्के, तर 75 वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवासात सवलत लागू केली होती. मात्र, या सवलतींमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.सातत्याने सवलतीच देत राहिलो, तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी 50 टक्के सवलतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच इथून पुढे महिलांना सवलतीने एसटी प्रवास करता येईल का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंत्री सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना एसटी प्रवासात दिलेली 50 टक्के सवलत बंद होणार काय, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले आहे.