भिवंडी : ठाणे - कल्याण - भिवंडी मेट्रो प्रकल्प 5च्या कामाच्या ठिकाणी भिवंडीतील धामणकर नाका ते नारपोली हद्दीतून 22 वर्षीय युवक रमजान अली शेख हा साथीदारासह काम आटोपून प्रवासी रिक्षामध्ये बसून त्याच्या विठ्ठल नगर येथील राहत्या घरी जात असताना रिक्षा रतन टॉकीजजवळ आली असता अचानकपणे मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या ब्रिजवरून सळई कोसळून रिक्षाच्या आरपार होऊन युवकाच्या डोक्यात घुसून विचित्र अपघात घडला.
यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. त्यास तत्काळ येथील खासगी नोबल रुग्णालयात दाखल करण्यात येऊ न त्याच्यावर मंगळवारी रात्री तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 5 तास शस्त्रक्रिया केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शस्त्रक्रियेनंतर युवक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजते आणि हा युवक किती वेळेपर्यंत शुद्धीत येईल याची शाश्वती देवू शकत नसल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. दरम्यान कंत्राटदार कंपनीच्या ठेकेदाराला अशा कारभाराच्या विरोधात एमएमआरडीएने ठेकेदारास 50 लाखांचा दंड ठोठावला असून या घटनेच्या चौकशी करिता स्वतंत्र कमिटी स्थापित करण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षणातील त्रुटींकरिता 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी राजकीय विरोधी पक्षांनी कडाडून विरोध व्यक्त करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करणार
याप्रकरणी जखमी रमजानचा प्रत्यक्षदर्शी साथीदार अख्तर मूर्तजा अन्सारी (55) याच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचे तपास अधिकारी पोउनि संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचा पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित घटनेच्या दोषी कर्मचारी,अधिकारी अथवा ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.