नालासोपारा : वसई पूर्वेकडिल नवजीवन येथील खदानित डंपर पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चालकासह 13 वर्षीय बालकाचा समावेश आहे. यामुळे वसई तालुक्यातील खदानींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघाताप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वसई तालुक्यातील खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे ब्लास्टिंग केलं जात असल्यामुळे आजूबाजूचा परिसर ठिसूळ बनला आहे. खदानीत होणार्या ब्लास्टिंगमुळे भूस्खलन झाल्याचा स्थानिकांचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काल बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास चालक समद शेख (23) व नरेश पवार (13) हे दोघे रिकामा ट्रक घेऊन जात असताना अचानक भूस्खलन होऊन ट्रक दरीत कोसळला. ही खदान कागदोपत्री बंद आहे. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी खदान मालक व संबंधित अधिकार्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे उप जिल्हाध्यक्ष भूषण नाईक यांनी केली आहे. दरम्यान महसूल अधिकार्यांनी संबंधित खदान बंद असून सर्व खदानींना संरक्षित करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत असे सांगितले.