Child Marriage Pudhari
ठाणे

Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश

ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी होणारा बालविवाह यंत्रणांनी रोखला. चाईल्ड हेल्पलाईनच्या माहितीनंतर महिला व बाल विकास विभागाने कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी ३० ऑगस्ट रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात यंत्रणांना यश मिळाले आहे. चाईल्ड हेल्प लाईनच्या पुणे नियंत्रण कक्षामधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा विवाह २८ वर्षीय तरुणाशी होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली.

माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक श्रद्धा नारकर यांनी संबंधित कॉलरशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. बालिका उल्हासनगर येथील राहणारी असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार उल्हासनगर येथे कर्मचारी पाठविण्यात आले.

एकात्मिक बालविकास योजनेच्या उल्हासनगरच्या सुपरवायझर सुषमा खरात, चाईल्ड हेल्पलाईनच्या सुपरवायझर स्वाती मोरे व केस वर्कर दीपाली कांबळे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलिसांच्या मदतीने संबंधित पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांच्या घरी चौकशी केली असता संबंधित कुटुंबीय गावाला गेल्याची माहिती मिळाली.

यानंतर मुलीच्या आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. आईला घटनास्थळी बोलावून तिच्याशी चर्चा करण्यात आली. मुलीची जन्मतारीख व आधारकार्ड तपासणी केली असता मुलगी १६ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले.

बालविवाह होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या समन्वयातून ही कार्यवाही करण्यात आली.

बालविवाह ही कायद्याने प्रतिबंधित प्रथा असून, बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जिल्हा महिला व बाल विकास प्रशासन, चाईल्ड हेल्पलाईनशी १०९८, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बालविवाह बाबत ग्राम बाल संरक्षण समिती, वॉर्ड बाल संरक्षण समिती, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी यांनी जबाबदारीनेे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गांभीर्य ओळखून कारवाई

बालविवाहाचे गांभीर्य व त्याचे कायदेशीर परिणाम पालकांना समजावून सांगण्यात आले. तसेच बालविवाह होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. पालकांकडून हमी पत्र घेण्यात आले. बालकल्याण समिती, ठाणे यांच्या आदेशानुसार बालिकेला तिच्या पालकांच्या जबाबदारीवर सुपूर्द करण्यात आले.

तसेच ज्या मुलाबरोबर विवाह ठरलेला होता त्यांना देखील पालका सहित उपस्थित राहण्यास कळविण्यात आले. परंतु ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सदर ग्राम बाल संरक्षण समिती ला मुलाच्या घरी गृह भेट करणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT