भिवंडी : भिवंडीच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीचे पात्र शनिवारी पहाटेपासून झालेल्या पावसामुळे वाढले होते. त्यामुळे नदीकाठच्या विसर्जन घाटासह नदी लगतच्या म्हाडा कॉलनी, संगम पाडा, ईदगहा या परिसरातील झोपडपट्टीत पाणी शिरले होते. अशा परिस्थितीमध्ये सायंकाळी म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या आतिफ शेखचा कचरा फेकण्यासाठी गेला असता पाय घसरून नदी पात्रात पडला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आतिफचा मृतदेह रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी जवळील पात्रात आढळून आला. या बाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु या दुर्घटने बाबत पालिका आपत्कालीन कक्ष अथवा अग्निशामक दलाकडे नोंद नसल्याने त्यांच्या कडे या दुर्घटने बाबत माहिती नव्हती.
दुसऱ्या घटनेत भिवंडीतील गैबी नगर येथील गुलजार नगर येथे राहणारा मोहम्मद गौस नफीस अन्सारी हा आपल्या तीन-चार मित्रांबरोबर चाविंद्र गावच्या हद्दीत कामवारी नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला. नदीपात्राजवळ बसलेला असताना मित्र खेकडे पकडत होते. मोहम्मद गैस पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे आपल्या पथकासह अग्निशामक दल जवानांसह घटनास्थळी पोहचले असून युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.