सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भोगाव कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या कचर्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याच्या (बायोमायनिंग) प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 24 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे वाढत असलेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून गंभीरपणे बनत चालला होता. महानगरपालिकेच्या भोगाव येथील 54 एकर जागेत हा कचरा डंप केला जात होता. गत काही वर्षांपासून मनपाने कचर्यापासून वीज-खत निर्मितीचा प्रकल्प बीओटी तत्वावर सुरू केल्याने नवीन कचरा या प्रकल्पासाठी दिला जात आहे, मात्र त्याआधीपासून वर्षानुवर्षे साचलेल्या कचर्याचे भलेमोठे ढीग पडून होते.
या साठविण्यात आलेल्या कचर्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊन आसपासच्या वस्त्यांमध्ये नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत मनपाकडे तक्रार करुनही त्याची दखल होत नसल्याने नागरिकांनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. दरम्यान मनपाने दोन प्रकारच्या पद्धतीने या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार केला होता तसेच शासनाकडे निधीची मागणी केली होती. नुकतेच शासनाने आराखड्यास मंजुरी दिली.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अभियानाच्या घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत या बायोमायनिंग प्रकल्पाकरीता नुकतेच केंद्राचे24 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. या निधीमुळे वर्षानुवर्षे साचलेल्या कच-याचा प्रश्न मार्गी लागून प्रदूषणाची समस्या मिटण्यास मदत होणार आहे. ओला व सुका कचरा हा प्रयोग यामुळे शक्य होणार का हेही महत्वाचे आहे.
महापालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून 24 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय मनपास प्राप्त झाला आहे.या निधीतून भोगाव येथील कचर्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
– पी. शिवशंकर, मनपा आयुक्त