सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पालखीमार्गांवर वारकर्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला राज्य शासन सुमारे 1 कोटी 56 लाख रुपये देणार आहे. तेवढीच रक्कम जिल्हा परिषदेला तीर्थक्षेत्रातून तरतूद करीत वारकर्यांसाठी पालखीमार्गांवर सोयीसुविधा देण्याचे काम करावे लागणार आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दरम्यान, पंढरपूर येथे होणार्या आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा जिल्ह्यांतून पालख्या येतात. अनेक गावांमध्ये या पालख्यांचा मुक्काम असतो. मुक्कामाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतींना 50 टक्के निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून देण्यात येणार आहे. उर्वरित 50 टक्के निधी राज्य शासन जिल्हा परिषदांना देणार आहे.
पालखीमार्गांवर मुक्कामी गावात वारकर्यांसाठी निवारा तसेच स्वच्छतेसाठी तात्पुरती शौचालये, पाणीपुरवठा तसेच औषधोपचाराची सोय त्या-त्या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. काही पालख्यांसोबत वारकर्यांची संख्या मोठी असते.त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना मूलभूत सोयीसुविधा आणि स्वच्छता तसेच पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. काही वेळा ही व्यवस्था तात्पुरती स्वरूपाची असल्याने काही साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करवी लागते.
ऐनवेळी गोंधळ होऊ नये, तसेच निधीची कमतरता पडू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून या ग्रामपंचायतींना अनुदान दिले जाते.दरवर्षी शासनाकडूनही अनुदान दिले जात होते. यंदा मात्र 50-50 टक्क्यांचा फार्म्युला काढण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून या 50 टक्के रकमेची तरतूद करावी लागणार आहे. ग्रामपंचायतींना आता जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळाल्यानंतरच सोयीसुविधा पुरविण्याची तरतूद करावी लागणार आहे.