सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेतील विविध विभागीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
बहुतांश विभागांत अधिकारी व कर्मचार्यांची संख्याही कमी दिसून येत आहे. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत येणार्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची वर्दळ यापूर्वीच कमी झाली आहे.
प्रलंबित कामे पूर्ण करुन घेण्यासाठी काही ठेकेदार, लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत सध्या येतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य असल्याने त्यांनीही जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, आरोग्य, शिक्षण, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सामान्य प्रशासन विभाग आदी कार्यालयांत नेहमीच वर्दळ दिसून येते. मात्र पावसामुळे या सर्व विभागांत शुकशुकाट दिसून येत आहे.
पावसामुळे अधिकारी व कर्मचार्यांनाही वेळेत कार्यालयात पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयातील होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा प्रशासकीय कारभारही विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.