सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : टाकळी हेड वर्क्समधील जुने 50-60 वर्षांपूर्वीचे सहा पंप बदलण्याचे काम बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास संपुष्टात आले. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला. हा व्यत्यय दूर करण्यासाठी पालिका अधिकार्यांची सकाळपासूनच धडपड सुरू होती, तर पाणी न आल्याने नागरिकांनी टाहो फोडत मिळेल, त्या वाहनांद्वारे पाणी आणले.
पाणी उपशात सतत बिघाड होत असल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने टाकळी हेड वर्क्समधील जुने सहा पंप बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे दीर्घ शटडाऊन घेण्यात आला. यामुळे पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला. पूर्वीचे पंप हे 450 एचपीचे होते, तर आताचे हे पंप 495 एचपीचे आहेत. नव्याने बसविण्यात आलेले पंप हे गतीने पाण्याचा उपसा करणार आहेत. शिवाय बिघाड व व्यत्यय येणार नसल्याचा विश्वास महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी केला.
सकाळी दहापासून हे काम सुरू करण्यात आले. यासाठी पाणीपुरवठा अधिकारी नीलकंठ मठपती, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, आवेक्षक काशीनाथ कल्याणशेट्टी हे टाकळी येथील बंधिस्त विहिरीत थांबून काम करून घेतले. हे काम पुण्यातील 20 मजुरांनी दिवसभरात पूर्ण केले.
दरम्यान, आज पाण्याचा दिवस असलेल्या भागात पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले होते. यामुळे काही नागरिकांनी पाण्याची बचत करुन ठेवली होती. तर काहींची तारांबळ उडाली. चारचाकी हातगाड्या, मोटरसायकल, सायकलसह डोक्यावर मिळेल तेथून पाणी आणून गरज नागरिकांनी भागविली. मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने पाण्यासाठी नागरिकांच्या अंगातून घामाच्याही धाराही वाहिल्या.
पंप बदलण्याच्या कामास बुधवारी सकाळी दहापासून कामाला सुरुवात झाली. भर उन्हात अधिकार्यांसह 20 कर्मचारी राबत होते. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. वेल्डिंगचे काम असल्याने थोडा कालावधी लागला.
– नीलकंठ विभुते, पाणीपुरवठा अधिकारी, मनपा
पंप कार्यान्वित झाल्यानंतर सोरेगाव येथे पाणी पोहोचण्यासाठी किमान तीन तास लागणार आहेत. फिल्टर होण्यासाठी तास ते दीड तासांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शहरातील साठवण टाकीत पाणी भरण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.