पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या 5 जुलै रोजी मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुकीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच विठ्ठल परिवार एकत्रित निवडणूक लढवेल असे वाटत असतानाच बुधवार, दि. 15 रोजी झालेल्या सभासदांच्या बैठकीत युवराज पाटील, गणेश पाटील व दीपक पवार हे स्वतंत्र पॅनेल उभा करुन निवडणूक लढविण्यावर एकमत झाले आहे. यामुळे विठ्ठल परिवारात फूट पडली आहे. त्यामुळे विठ्ठलची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. छाननी होऊन अर्ज माघारी घेण्याचा कालावधी सुरु आहे. त्यामुळे विठ्ठल कारखाना सुरु व्हावा व विठ्ठल परिवाराच्या ताब्यात राहावा, याकरिता विठ्ठल परिवार एकसंध ठेवण्यासाठी सर्वच नेते प्रयत्नशील आहेत.
मात्र, काल झालेल्या विचारविनिमय बैठकीत उपस्थित सभासद शेतकर्यांनी विठ्ठलसाठी युवराज पाटील, गणेश पाटील व दीपक पवार हे स्वतंत्र पॅनेल उभा करा, भालके-काळे यांच्याकडे जायला नको, अशी भूमिका घेतल्याने युवराज पाटील यांनी सभासदांच्या मागणीला साथ देत स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचे घोषित केले. आणि कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरु करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. कारखान्याचा चेअरमन किंवा आमदार होण्याचे उद्दिष्ट नसल्याचे सांगितले. यावेळी अॅड. गणेश पाटी, अॅड. दीपक पवार, अमरजित पाटील व ऊस उत्पादक उपस्थित होतेे.