पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : चैत्र वारीसाठी पुणे जिल्ह्यातून पिकअप वाहनातून वारकरी पंढरपूरला येत होते. पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट विजेच्या खांबाला धडकला. या अपघातात 19 वारकरी जखमी झाले. चार वारकरी गभीर जखमी आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे घडली.
पंढरपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन जखमींना सोलापूर व पंढरपूर येथे हलविले. शिवाजी गणपत पडवळ, लिलाबाई तुकाराम शिवेकर, संगीता रामदास काटकर, शालन नामदेव आवारे, वर्षा नामदेव मदगे, पुष्पा ज्ञानेश्वर शेटे, लिलाबाई बाबुराव कदम, गंगुबाई तुकाराम गायकवाड, पांडू बोमू कदम, भाऊसाहेब हरिभाऊ जाधव, भामाबाई एकनाथ पडवळ यांच्यावर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ज्ञानेश्वर भिामाजी झगडे, रामदास नानाभाऊ बदाले, बाबुराव रामचंद्र गायकवाड, रोहिदास भिकाजी वाहिले, नंदा बाबुराव गायकवाड, विमल मधुकर धोंडोरे, मिराबाई सिताराम बाबर, मंगल निवृत्ती झगडे या जखमींवर पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे व नवलाख उंबरे (ता.मावळ, जि. पुणे) येथून चालकासह 20 वारकरी पीकअपमधून (एम.एच.14 जी.डी. 8461) येत होते. पिकअप चालक भाऊसाहेब जाधव यांचा पहाटे पाचच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने वेळापूर-पंढरपूरच्या दरम्यान पिराची कुरोली हद्दीत गाडी रस्त्याच्या खाली जावून वीजेच्या खांबाला थडकली. त्यामुळे खांब वाकला. सुदैवाने विद्युत स्पार्किंग झाले नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. यात अपघातात वाहनाचे सुमारे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत रोहिदास भिकाजी वाहिले यांनी भाऊसाहेब हरिभाऊ जाधव याच्याविरोधात फिर्याद दिली.