सोलापूर : पुढारी वृत्तसेवा विधान परिषद निवडणुकीत भाजप सहावी जागा जिंकणे कठीण होते. मतांची बेरीज होत नव्हती, त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मी माघार घेतली, असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात येेणे अपेक्षित आहे.त्यावेळी ते माझा नक्की विचार करतील मला ते वार्यावर सोडणार नाहीत, असा विश्वास आहे, असे ते म्हणाले. पंचायतराज समितीच्या दौर्यानिमित्त सदाभाऊ खोत हे सोलापूर दौर्यावर आले होते. बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
ते म्हणाले, मी मैदानावरील कार्यकर्ता आहे. त्यामुळे कधीही संपणार नाही. लढणे आणि संघर्ष करणे आपले काम आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांसाठी कायम रस्त्यावर उतरुन काम करण्याची आपली तयारी आहे.त्यामुळे आमदार असलो काय आणि नसलो काय, राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणे महत्वाचे आहे. ते म्हणाले, राजकारणात अनेक मंडळी सदरेवर हुजरेगिरी करीत असतात त्यापैकी मी नाही. त्यामुळे सत्ता आल्यानंतर माझा विचार होईलच.विधानपरिषदेच्या निवडणुकीत गतवेळी भाजपाच्या सहा जागा होत्या.
त्यामुळे सुरुवातीला सहा जागेवर उमेदवार उभे करणे गरजेचे असल्याने फडणवीस यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र मतांची गोळा बेरीज केल्यानंतर सहावी जागा निवडून येणे कठीण होते. त्यासाठी पराभव नको म्हणून माघार घेतली. खोत यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चौफर टिका केली. महाविकास आघाडीत सध्या समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे सर्वाधिकार राष्ट्रवादीच्याच नेत्यांना आहेत. शिवसेना नावालाच सत्तेत आहे.