सोलापूर : चादर टॉवेल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरसह देशातील सर्वच वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये मंदीचे सावट आहे. गत अनेक महिन्यांपासून मालाला उठाव नसल्याने कारखाने अर्धवेळ चालविण्यात आहेत. मागणीत एक तृतीयांश इतकी घट झाल्याचे उद्योजकांसह रोजीरोटीच्या चिंतेने कामगारवर्ग हवालदिल झाला आहे.
टेक्स्टाईल उद्योग हा हंगामी धंदा समजला जातो. साधारणपणे दिवाळी ते जून या कालावधीत टेक्स्टाईलच्या उत्पादनांना मोठी मागणी असते. ऑफ सिझनमध्ये मागणीत प्रचंड घट होते. गत अनेक महिन्यांपासून मालाला उठाव नसल्याचे चित्र केवळ महाराष्ट्रातील सोलापूर, इचलकरंजी, भिवंडीच नव्हे तर देशभरातील भिलवाडा (मध्यप्रदेश), लुधियाना (पंजाब) यासह तामिळनाडू या राज्यातही सारखेच आहे. सोलापुरात चादर- टॉवेल तर भिवंडी, इचलकरंजीत ग्रे कापडाचे उत्पादन होते. अशा सर्वच उत्पादनांना सध्या मागणी नाही. परिणामी, उत्पादन घटले आहे. मालाला उठाव नसल्याने सोलापुरात गत चार-पाच महिन्यांपासून कारखाने अर्धवेळ चालविण्यात येत आहे.
कामगारांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कामगारांची रोजीरोटी शाबूत राहावी याकरिता सोलापुरात अर्धवेळ का होईना कारखाने सुरू ठेवण्यात येत आहेत. उत्पादित मालाचा साठा करण्यात येत आहे. जास्त साठा करण्याची क्षमता नसल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत, तर रोजगार घटल्याने कामगार चिंताग्रस्त आहेत. वाढत्या महागाईच्या जमान्यात कामगारांच्या उत्पन्न- खर्चाचे गणितच कोलमडले आहे. एकंदर टेक्स्टाईल उद्योग संध्या संक्रमण अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहे
मालाला उठाव नसल्याने दिलेल्या मालाचे पेमेंट येत नसल्याने तसेच सूत व्यापारी व खासगी वीज वितरकांच्या मनमानीला कंटाळून भिवंडीतील टेक्स्टाईल उद्योगाची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. गत अनेक महिन्यांपासून अशी स्थिती असल्याने भिवंडी पॉवरलूम असोसिएशनने १ ते १५ ऑक्टोबर असा १५ दिवसांचा बंद पुकारला आहे. यावरून टेक्स्टाईल उद्योगाची दयनीय स्थिती अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या सोलापूरच नव्हे तर देशातील टेक्स्टाईल उद्योग अडचणीत आहे. डोमेस्टिक तसेच एक्सपोर्ट अशा दोन्ही ठिकाणी मागणीत प्रचंड घट झाली आहे. दिवाळीपासून परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा आहे.
पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ