सोलापूर : समाजातील दुःख ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची प्रेरणा आहे. हीच धारणा घेऊन स्त्री सक्षमीकरणासाठी प्रचंड मोठे कार्य करणार्या उद्योगवर्धिनी संस्थेचा वैभवसंपन्न वारसा राष्ट्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा ठरणार आहे. वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहिल्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी सोलापुरात व्यक्त केला.
उद्योगवर्धिनी संस्थेचा परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साही वातावरणात झाला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. भागवत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, सेवाभारतीचे सोलापूर शहर अध्यक्ष राजेश पवार, उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान, सचिवा मेधा राजोपाध्ये उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित ‘उद्योगवर्धिनी की सेवाव्रती’ या नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. तसेच अखंड यात्रा या माहितीपटाचेही उद्घाटन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत झाले.
उद्योगवर्धिनीच्या महिलांनी बनविलेल्या दोहड, विलायची हार, वॉल हँगिंग, श्री शुभराय महाराजांवरील पुस्तक, पूजा भूमकर यांनी भरतकामाच्या माध्यमातून साकारलेली सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रतिमा देऊन डॉ. भागवत यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना राम रेड्डी म्हणाले, संघर्षमय जीवन जगणार्या महिलांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचे कार्य उद्योगवर्धिनी करते. गरजू महिलांचा कौशल्य विकास करत त्यांना उद्योगाच्या आधारे सक्षम करण्याची ही प्रक्रिया आहे. केवळ सोलापूरमधील नव्हे, तर महाराष्ट्रातील महिलांना आधार देणारी संस्था म्हणून उद्योगवर्धिनी उदयास येत आहे.
संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविकात उद्योगवर्धिनी ही समाजाची आहे, समाजाने त्यात योगदान द्यावे, ज्येष्ठ संघ प्रचारक नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही संस्था स्वयंसेवकांच्या मदतीने, सोलापूरकरांच्या सहकार्याने आणि महिलांच्या कष्टावर उभी राहिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची तयारी आहे. त्यासाठी प्रशासनासह समाजाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. सुहासनी शहा यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधवी रायते यांनी आभार मानले. कल्याणी पाटील आणि ऐश्वर्या सारोळकर यांनी स्वागत गीत गायन केले. संस्कृती देशपांडे आणि शिल्पा जिरांकलगी यांनी वंदे मातरम् गायले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नित्य कार्यात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आग्रह धरला जातो, याची प्रचिती पुन्हा एकदा सोलापूरकरांना आली. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर लावलेला फलक, सजावट आणि इतर सर्व वस्तू पर्यावरणपूरकच वापरल्या होत्या.