सोलापूर : हवामान विभागाने १२ व १३ जून रोजी पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला होता. मात्र सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिली. एलो अलर्टचा इशारा देऊनही पावसाने दडी मारल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. तापमान मात्र 38.2 अंश सेल्सिअसवर अंशांवर कायम राहिला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सोलापुरात मान्सूनची चार दिवसांपूर्वी आगमन होऊनही अद्याप बरसत नसल्याने अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहिले, परंतु पाऊस झाला नाही. त्यामुळे दिवसाचे तापमान उच्चांकी राहिले असून आर्द्रतेमुळे उकाड्यात अधिक भर पडली आहे.
देशभरात नैऋत्य मान्सूनचा प्रवास सुरू असला तरी त्याची गती काहीशी मंदावल्याचे हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. सोलापूर परिसरापर्यंत मान्सूनची सीमारेषा पोहोचली असली तरी पुढील प्रगती अपेक्षित वेगाने होत नसल्याने जिल्ह्यात अद्याप व्यापक पावसाची सुरुवात झालेली नाही.
खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता पहिल्या दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. देशातही जूनच्या पहिल्या दहा दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
जून महिन्याचा मध्य जवळ आला असतानाही सोलापूरमध्ये उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश काहीसा कमी असला तरी हवेत वाढलेली आर्द्रता आणि उष्णतेमुळे नागरिक घामाघूम होत आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून येत आहे.