सोलापूर : हिप्परगा तलाव ओव्हरप्लो झाल्यामुळे सांडव्याच्या माध्यमातून आलेल्या पाण्यामुळे शहरातील नाले देखील ओसंडून वाहत होते. यामुळे यश नगर भाग एक, वसंत विहार, मडकी वस्ती, गणेश नगर, आर्यनंदी नगर, अवंती नगर भागातील रहिवाशांना पाण्याचा धोका वाढला होता. गुुरूवार सकाळ पासून नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पुराचा धोका टळला आहे.
पाण्यामुळे बंद झालेले रस्ते देखील मोकळे झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सोलापूर शहरातील नाले बुधवारी सकाळपासून ओसंडून वाहत होते. दुपारपर्यंत वसंत विहार जवळील नाला काटोकाट भरून वाहत होता. सायंकाळी पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे या भागात पूरपस्थितीची शक्यता होती. सोलापूर महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा तयार होती. या भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नगरातील नागरिकांना इतर ठिकाणी स्थंलातरीत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
महापालिका आयुक्तासह अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी परिस्थीतीवर नियंत्रण ठेऊन होते. मात्र बुधवारी पाणी कमी झाल्यामुळे बंद पडलेले रस्ते देखील खुले झाले आहेत. त्या रस्त्यांवरून वहिवाट चालू आहे, महापालिकेच्या अधिकार्यांनी पाणी कमी झालेल्या भागाची पुन्हा पाहणी केली आहे. पुराचा धोका टळल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.