पंढरपूर : खग्रास चंद्रग्रहण दि. 3 मार्च रोजी असल्याने श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता यांच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात येत आहेत. पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायं. 6.34 वा. असून मोक्ष सायंकळी 6.48 वा. आहे. पंढरपूर येथे सूर्यास्त सायं. 6.34 वा. होत असल्याने सायं. 6.34 ते 6.48 या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात येणार आहेत. या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
ग्रहण काळात नित्योपचारात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार काकड आरती व नित्यपूजा पहाटे 4.00 ते 5.55 वा. नेहमीप्रमाणे. महानैवेद्य सकाळी 10.45 ते 11 वा. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा नैवेद्य दाखविण्यात येईल. पोशाख, दुपारचा नैवेद्य 4.30 ते 5 वा. ग्रहणाचा वेध सुरू होणार असल्याने लाडूचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा दाखविण्यात येईल.
ग्रहण स्पर्शानंतर (सायंकाळी 6.34 वा.) श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदी (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येईल. ग्रहण मोक्षानंतर (सायंकाळी 6.48 वा.) सर्व देवतांना पुनः स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात येईल. धुपारती रात्री 9.30 वा. शेजारती रात्री 12 वाजे नंतर नेहमीप्रमाणे होईल. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या नित्योपचारात वरीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत. भाविकांनी दर्शन व पूजाविधीच्या वेळेत याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.