पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात बुधवारी (दि. 14) दुपारी 12 वाजून पाच मिनिटांनी पार पडला.
'या पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं…. या गाण्यावर वर्हाडी मंडळींनी ठेका धरला. भाविकांनी पंढरीनगरी गजबजली. सायंकाळी शोभा यात्रेनंतर शाही विवाह सोहळ्याची सांगता झाली. एरवी टाळ-मृदुंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणार्या मंदिरात बुधवारी सकाळी दहापासून सनई चौघड्यांचा आवाज सुरू होता. उपस्थित वर्हाडी मंडळीची लगबग सुरू होती. देवाचे लग्न लावण्यासाठी शेकडो वर्हाडी या वेळी उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर आणि गाभारा फुलांनी सजवण्यात आला होता. झेंडू, शेवंती, गुलाब, निशिगंध, एथोरियम, ऑरकेड, कामिनी, अष्टर, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी आदी 25 प्रकाराच्या सात टन आकर्षक फुलांनी मंदिरास सजवत गजरूपी मंडप तयार करण्यात आला. ही सजावट पुणे येथील भाविक भारत भुगबळ यांनी केली.