Solapur unseasonal rain  
सोलापूर

Solapur unseasonal rain| वैराग भागाला अवकाळीचा फटका, द्राक्ष बागांसह गहू ज्वारी हरभरा पिकांचे नुकसान

यावर्षी अतिवृष्टीने अगोदरच घायाळ झालेला बळीराजा या अवकाळीने दुहेरी संकटात सापडला आहे

पुढारी वृत्तसेवा

वैराग : वैराग परिसरातील दहिटणे, मुंगशी, तडवळे, ढोराळे, यावली, सासुरे इर्लेवाडी आदी गावातील द्राक्ष बागासह गहू , ज्वारी, हरभरा आदी पिकांना अवकाळीचा तडाका बसला आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठी आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. यावर्षी अतिवृष्टीने अगोदरच घायाळ झालेला बळीराजा या अवकाळीने दुहेरी संकटात सापडला आहे.

द्राक्षबागांना तर महागडी खते , औषधे , तसेच छाटणी, फवारणी, रोजगार याचा भयानक खर्च झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे आपली पिके उभा केली होती. परंतु या खराब वातावरणामुळे व अवकाळी मुळे अक्षरशः बळीराजाच्या स्वप्नाचा चिखल झाल्याचे पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईने अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून निदान पिकांना जोपासन्यासाठी केलेला खर्च तरी निघेल का ? ह्याच चिंतेत शेतकरी पडला आहे.

अतिवृष्टीची तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांना शासनाने ही निवडणूकीच्या तोंडावर पिक विमा देण्याचे आश्वासन दिले मात्र निवडणूका पार पडल्या तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत. या निमित्ताने बळीराजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे या अस्मानी संकटातून सावरायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा आहे.

यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडणार असून परतीचा पाऊस चांगला होईल सोलापूर जिल्ह्यात एक मार्चपर्यंत वातावरण खराब राहील एक मार्चपासून उष्णता वाढण्याची शक्यता आहे तरी काढणीला आले ली पिके काढून घ्यावीत.
- डॉ. पंजाबराव डक, हवामानतज्ञ
या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झाला असून त्यात पिक हातात येण्याच्या अगोदर ढगाळ वातावरणा सह अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे
- महावीर क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT