सोलापूर : पुणे घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठा शुक्रवारी सायंकाळी ४५.८७ टक्के इतका झाला. दरम्यान, वीर धरणातून नीरा नदीत ५ हजार ७३७ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात पुणे परिसर आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने उजनी धरणात दौंड येथून १ लाख ६४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे धरणाच्या टक्केवारीत झपाट्याने वाढ झाली. आता पावसाने विश्रांती घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी उजनीतील आवक ही १४ हजार ०६२ क्युसेक झाली आहे.
भीमा नदीकाठी ५ तास वीजपुरवठा
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठी आठ तासावरून वीज पुरवठा २ तासावर करण्यात आला आहे. त्यामुळे पिके करपू लागले आहेत. विधानसभेच्या अधिवेशात ८ तास पूर्ववत वीजपुरवठा सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. आता प्रशासनाने २ तासाऐवजी ५ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज, शनिवारी दि. ११ जुलै रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना घालण्यात येणारा घेराव रद्द करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले.