सोलापूर : उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत कडक उन्हाळा आणि धरणातील विसर्गामुळे पाणी पातळीत सातत्याने घट होत आहे. बुधवारी दि. 20 मे रोजी सकाळी 6 वा. उजनीतील पाणी पातळी उणे 15.22 टक्के म्हणजे उणे 8.15 टीएमसी इतका होता. सध्या उजनी धरणात 55.50 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
गेल्या वर्षी मे ते सप्टेंबर 2025 अखेर मुसळधार पाऊस पडल्याने भीमा, सीनेसह अन्य नद्या नाल्यांना पूर परिस्थिती ओढावली होती. दरम्यान सूमारे 250 टीएमसी इतका पाणी भीमा नदीतून वाहून गेले होते. तरीही मे अखेर जिल्ह्यात काही अंशी पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
जानेवारीअखेरपर्यंत उजनी धरण हे शंभर टक्के भरले होते. मागील चार महिन्यातच 121 टीएमसी एवढी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा निम्मा कमी होऊन तो बुधवारी 55 टीएमसी एवढा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी धरणाची पाणी पातळी मायनस 23 टक्के होती. यंदाच्या वर्षी देखील ही पाणी पातळी आता त्या दिशेने वाटचाल करत असून आजच्या आकडेवारीनुसार मायनस पातळी साडे पंधरा टक्के इतक्या खाली पोहोचली आहे.
सध्या 2153 क्युसेक ने धरणातून कॅनल द्वारे शेतीसाठी पाणी पाणी सोडले जात असून होणारी बाष्पीभवन यामुळे दररोज दोन टक्के एवढा पाणीसाठा कमी होत आहे. बोगद्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.