सोलापूर : उजनी धरण क्षेत्रात यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याने जुलै महिन्यांतच धरण शंभर टक्के भरले होते. गेल्या दीड महिन्यांत भीमा नदीसह, सीना बोगदा, कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तब्बल 32 टक्के पाणी पातळी कमी झाली आहे. दि. 27 फेबु्रवारी रोजी धरणात 68.87 टक्के म्हणजे 36.89 टीएमसी पाणीसाठा आहे. मृत साठा धरून एकूण पाणीसाठा 100 टीएमसी आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत 4400 क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक असा एकूण 6 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यानंतर विसर्ग बंद केला जाणार आहे. धरणातून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव व सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे. 26 जानेवारीपासून आतापर्यंत धरणातील पाणी पातळी 32 टक्के कमी झाली आहे.
धरणातून रब्बी हंगामासाठी सुरुवातीला उजनी मुख्य कालवा, जोड कालवा व दहिगाव योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सीना माढा उपसा सिंचन योजना व पाच फेब्रुवारीपासून भीमा नदीत पाणी सोडण्यात येऊन नंतर 12 फेबु्रवारी रोजी बंद करुन पुन्हा 22 फेबु्रवारीपासून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने पुढील दोन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
समांतर जलवाहिनीमुळे सहा टीएमसीची बचत
सोलापूर शहराला पिण्यासाठी समांतर जलवाहिनी सुरू झाल्यामुळे पाच ते सहा टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. दरवर्षी जानेवारी, फेबु्रवारी, मार्च-एप्रिल आणि पावसाळा लांबल्यास जून, जुलै महिन्यांत उजनीतून सोलापूर शहराच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले जात होते. औज चिंचपूर बंधाऱ्यातून हे पाणी पाईपलाईनद्वारे उपसले जात होते. परंतू समातंर जलवाहिनीमुळे जूनमध्येही शेतीला पाणी मिळण्याची आशा आहे.
उपयुक्त पाणीसाठा 36.89 टीएमसी
गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनीची पाणी पातळी स्थिती आनंददायक राहिली आहे. सध्या धरणात एकूण 100 टीएमसी पाणीसाठा असून, यातील 36.89 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, तर मृतसाठ्यासह एकूण 100 टीएमसी पाणीसाठा आहे. आतापर्यंत 15 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.