सोलापूर : उजनी धरणातील सात टीएमसी पाणी उन्हाळी हंगामात पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निश्चित करण्यासह पिण्यासाठी मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर, लाभक्षेत्र विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणामध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी राखून ठेवण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.