सांगोला; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी नागपूर महामार्गावर काळूबाळू वाडी येथे मोटरसायकल डिव्हायडरला धडकल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशाल लक्ष्मण कटाप (रा. हातुरे वस्ती, सोलापूर), बसवराज धानाप्पा गौडरू (सोलापूर) हे जागीच मरण पावले तर शांतेश्वर सुर्यकांत शिरोळे हा जखमी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि. १८) सोलापूर येथील दोघेजण दुचाकीने संत बाळूमामा (आदमापूर) दर्शनासाठी कोल्हापूर येथे आले होते. देवदर्शन करून ते सोलापूरकडे निघाले. हे रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर काळूबाळू वाडी येथे रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आले. यावेळी मोटरसायकल (क्र. एम.एच. १३ बी डब्ल्यू. ७५३४) रस्त्याच्या डिव्हायडरला धडकल्याने या गाडीवरील विशाल लक्ष्मण कटाप (वय २६ वर्षे, रा. हातुरे वस्ती, सोलापूर) व बसवराज धानाप्पा गौडारू (सोलापूर) हे जागीच मरण पावले. या घटनेत शांतेश्वर सूर्यकांत शिरोळे (वय ३६ वर्षे रा. हातुरे वस्ती) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद घेण्याचे काम सांगोला पोलीस ठाण्यात चालू होते .