पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघीही बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजता घडली. तिघींपैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले, तर आणखी एकीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या तिन्ही महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या या तिन्ही महिला आज सकाळी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी सात वाजता पुंडलिक मंदिरालगत पाण्यात उतरल्या. यामध्ये सुनीता सपकाळ (वय 43) आणि संगीता सपकाळ (40) या दोन महिलांसह एक अनोळखी महिला अशा तीनही महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. या महिला पाण्यात बुडत असल्याचे पाहून नदीकाठावरील अन्य महिलांनी आरडाओरडा केला. मात्र बुडत असलेल्या महिलांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही. त्यामुळे त्या तिन्ही महिलांचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाला. घटनेनंतर नदी परिसरातील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.
चंद्रभागा नदीपात्रात आपत्कालीन व्यवस्था अस्तित्वात नाही. चंद्रभागा नदीत आपत्कालीनप्रसंगी उपयोगी होईल अशी जीवरक्षक एक बोट आणि कर्मचारी दिल्याचा गवगवा प्रशासन करत आहे. मात्र वास्तवात अशी कोणतीही व्यवस्था याठिकाणी नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन अशी व्यवस्था नदीकिनारी करणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.