सोलापूर : हाती टाळ-मृदंग, मुखी हरिनाम, खांद्यावर पताका आणि विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघालेले भाविक दुपारी चारच्या दरम्यान पार्क चौकातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर दाखल झाले अन् 'पंढरीसी जारे आल्याने संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥' याची प्रचिती आली. सगळे वारकरी एकत्र आले अन् माघ वारीतील पहिला गोल रिंगण सोहळा रंगला. हरिनामाच्या गजराने पार्क चौक दुमदुमून गेला.
अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने माघ वारीनिमित्त सोलापुरातून पालखी पंढरीकडे निघते. पहिल्याच दिवशी नॉर्थकोट प्रशालेल्या मैदानावर पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला. सोलापुरातून माघवारी पालखी सोहळा 200 वर्षांपासून चालत जात आहे. ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे. शहरातील प्रत्येक विभागातून वारकरी यात सहभागी होतात. आता त्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात झाले आहे. पालखी सोहळ्यात शहरातील 38 व परिसरातील 30 अशा 68 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. 50 महिला भजनी मंडळेही आहेत.