टेंभुर्णी : माढा तालुक्यातील मौजे आढेगाव येथे तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह लावल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एका नवरदेवासह १२ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून शासनाचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आढेगाव येथे दि.१० मे रोजी सोमवारी दु.१२.२५ वा.सुमारास तीन बालविवाह पार पडले होते. ग्रामविकास अधिकारी आकाश बापू पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ चे कलम १६ अन्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि.१०) दुपारी १२.३० वा. सुमारास तीन जोडप्यांचे बालविवाह आढेगावातील कोरड्या तलावातील मोकळ्या पटांगणात झाले होते. ग्रामसेवक पवार यांना या बाल विवाहाची माहिती समजताच त्यांनी अधिक माहिती घेतली.तसेच त्यांचे आधारकार्डवरून तीन विवाहांपैकी तिन्ही मुली व दोन मुले असे पाचजण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. यातील संशयित आरोपी क्र.१) बाळु बापु घोडके,२) वनिता बाळु घोडके,३) नामदेव भगवान जाधव,४) अविदा नामदेव जाधव,५) नवरदेव नवनाथ नामदेव जाधव,६) बाबासाहेब मनोहर जाधव, ७)राजीबाई बाबासाहेब जाधव,८) मनिषा शिवाजी भोसले सर्व रा.आढेगाव (ता.माढा) तसेच ९) महादेव मारूती निकम,१०) मंदा महादेव निकम दोघे (रा.शहा ता.इंदापुर जि.पुणे),११) संतोष ज्ञानेश्वर निकम,१२) सुनिता संतोष निकम दोघे (रा.निर निमगाव ता. इंदापुर,जि.पुणे) या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये १) १४ वर्ष ४ महिने,२) १५ वर्ष ४ महिने,३) १७ वर्ष १० महिने अशा तीन अल्पवयीन मुली तर १८ वर्ष ९ महिने व १८ वर्ष ११ महिने अशी दोन अल्पवयीन मुले आहेत.तसेच २३ वर्ष वयाचा नवनाथ नामदेव जाधव याचा सोबत १५ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात आले होते. या घटनेचा अधिक तपास पोसई स्वाती सुरवसे या करीत आहेत.