सोलापूर : राज्यातील विविध पक्षातील कारखानदारांनी भाजपाच्या नेत्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे साखर कारखानदार फायद्यात अन् शेतकरी, सर्वसामान्य जनता तोट्यात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
ईद ए मिलाद निमित्त आंबेडकर बुधवारी (दि.26) सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महागाईसह विविध मुद्यावरुन सरकारवर टिका केली. आंबेडकर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना तसेच काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे साखर कारखाने आहेत. हे नेते भाजपसोबत हातमिळवणी करुन स्वताचा फायदा करुन घेत आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत.
महागाईवर टीकास्त्र
साखरेसोबतच खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीही वाढत असल्याने महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले असून, सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
पेपरफुटीमुळे तरुणांचे नुकसान
एमपीएससीच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरफुटीमुळे शासकीय नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.