सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले असले, तरी वीजपुरवठ्यातील विसंगतीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कर्नाटक सरकार आपल्या शेतकऱ्यांना दिवसाला ८ तास वीजपुरवठा करत असताना, महाराष्ट्र सरकार मात्र केवळ २ तास वीज देत आहे. या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे नदीकाठची पिके वाळून चालली आहेत. शेतकऱ्यांना अखंड आणि नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर या गावांमध्ये अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे देशमुख म्हणाले.
पाण्याचा प्रश्न गंभीर
आमदार देशमुख यांनी मंद्रूप आणि परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही सभागृहात मांडला. कर्नाटकने भीमा नदीवर ६ मीटर उंचीचे बंधारे बांधल्याने तिथे पाणी अडते. महाराष्ट्रातील बंधारे केवळ ४ मीटर उंचीचे असल्याने पाणी वाहून जाते, अशी माहिती दिली.