संगमेश जेऊरे
सोलापूर : भाजपने यंदा जिल्हा परिषदेवर 38 हून अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी खुला प्रवर्गासाठी राखीव असून, यात रामप्पा चिवडशेट्टी, दीपक वैद्य, चैताली मुळे, बालाजी नरुटे यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आतापर्यंत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला अध्यक्षपदाची संधी न मिळाल्याने आता रामप्पा चिवडशेट्टी यांना संधी मिळेल यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. रामप्पा चिवडशेट्टी हे आ.सुभाष देशमुख आणि आ.सचिन कल्याणशेट्टी या दोघांशी सलोखा राखून आहेत.
उपळाई ठोंगे (बार्शी) गटातून भाजपाचे दिपक वैद्य विजयी झाले आहेत. तर नान्नज (उत्तर सोलापूर) गटातून भाजपाच्या चैताली मुळे विजयी झाल्या आहेत. पोखरापूर (मोहोळ) गटातून भाजपाचे बालाजी नरुटे हे उमेदवार विजयी झाले आहेत. वळसंग (दक्षिण सोलापूर) गटातून रामप्पा चिवडशेट्टी हे विजयी झाले आहेत. कासेगांव (पंढरपूर) गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे व्यंकट भालके हे उमेदवार विजयी झाले आहेत. सलगर गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे हे शिंदेसेनेकडून विजयी झाले आहेत. वागदरी (अक्कलकोट) गटातून प्रविण तानवडे हे शिंदेसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा ओबीसी खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने यासाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. जिल्ह्यातील 17 गट हे ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने आता जोरदार रस्सीखेच होणार आहे. यातील धक्कातंत्र वापरून भाजपा अध्यक्षपद कुणाला अध्यक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.