सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांत आयाराम, गयाराम हे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे बंडखोरीची लागण वाढल्याने नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावण्याचे आमिष दाखवून बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी एकच दिवस राहिली असून, आज (दि. 26) घडामोडींना वेग येणार आहे. 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. सध्या सोलापूरसह 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य घेण्याचा विचार शासन करत असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी जाहीर केल्याने बंडोबांना आश्वासनांचे डोस दिले जात आहेत.
महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्यांची नेमणूक व्हावी, असा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे मोठं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. हा बदल झाल्यास याचा ग्रामीण भागातील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.