सोलापूर : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यामध्ये भूगर्भातील पाणी पातळी वेगाने खालावत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत केवळ १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. मागील १० दिवसांत जिल्ह्यात टँकरच्या संख्येत तब्बल १० ने वाढ झाली.
सद्यस्थितीत ४८ गावे आणि १६९ वाड्यांमधील ७६ हजार ६६८ नागरिकांची तहान ३७ टँकरद्वारे भागवली जात आहे. प्रशासनाकडून सध्या ४८ गावांमध्ये टँकरच्या ५७ खेपा मंजूर करण्यात आल्या. याशिवाय, बुधवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणखी तीन गावांचे टँकरचे प्रस्ताव नव्याने मंजूर केले. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी १८ विहिरी आणि १० बोअरवेलचे अधिग्रहण प्रशासनाने केले.
गरज पडल्यास चारा डेपोंचा पर्याय
सद्यस्थितीत जिल्ह्यात मुबलक चारा आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पण, पाऊस लांबला आणि भविष्यात चारा टंचाई निर्माण झाली तर चारा डेपो सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले.