सोलापूर : भीमा खोऱ्यात पाऊस सुरूच असल्याने पूर नियंत्रणासाठी उजनी व वीर धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, भीमा नदीला पुराचा धोका कायम आहे. पुढील चार दिवस तरी भीमा नदीवरील मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील बंधारे ही पाण्याखालीच राहणार आहे. दोंडच्या वरील भागात पावसाचा प्रमाण वाढल्याने उजनीत सुमारे ५७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग मिसळत होता. त्यामुळे मंगळवारी रात्री ११ वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रात १ लाख १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे पुन्हा चंद्रभागा ही पुरप्रवण क्षेत्रातून वाहणार आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी उजनी पाण्याचा विसर्ग कमी करुन तो ६० हजार क्युसेक इतका करण्यात आला असला तरी काल सोडलेल्या पाण्यामुळे अजून दोन दिवस भीमा नदीवर पुराचे सावट कायम आहे. बुधवारी दुपारी नीरा नरसिंहपूर येथील संगमाजवळ १ लाख २५ हजार २० क्युसेक तर सायंकाळी ६ वाजता १ लाख १४ हजार ९२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर वीर धरणातून सायंकाळी साडे चार वाजता ५ हजार ६०९ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु होता.
उजनी धरण ९८ टक्के भरला असून, एकूण पाणीसाठा ही ११६.५८ टीएमसी इतका तर जिवंत पाणीसाठा ही ५२.९२ टीएमसी इतका आहे. उजनीतून भीमा नदीत सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक तर दहिगांव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक, मुख्य कालव्यातून २२५० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.