सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पाणीटंचाईविषयी बैठक घेतली. त्यामध्ये जिल्ह्यास 246 पाणी टँकर लागण्याची शक्यता असून, त्यासाठी पूर्वतयारी केल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार यांना दिली.
यंदाच्यावर्षी राज्यात फक्त 92 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. तसेच हा पाऊस जून अखेरीस सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीटंचाई भासल्यास काय तयारी केली, याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी उपाध्यक्ष पवार म्हणाले, सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे टंचाईमुळे एका टँकरद्वारे दररोज दोन खेपा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण 246 टँकर प्रस्तावित असून, मागणी येईल तेथे पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात येतील. सध्या तरी जिल्ह्यात पाणीटंचाई नाही. मात्र, मे आणि जून अखेरपर्यंत काही गावे, वाड्या, वस्त्या येथे पाणीटंचाई भासेल. त्या अनुषंगाने पाणी टँकरचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.