सोलापूर : पुढील महिन्यांत आषाढी वारी आहे. वारीनिमित्त जिल्ह्यात लाखो वारकरी, भाविक येत असून, त्यांना उत्कृष्ट सुविधा अन् सुरक्षा द्यावेत, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे शुक्रवारी (दि.१९) दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांचा पालखी सोहळा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, जी. एस. कथले, साहेबराव देसाई, सुनील माने, गजानन नेरपगार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यातील अडथळे, रिंगण सोहळ्याचे ठिकाण, पालखी मुक्कामाची ठिकाणे, रस्ते व पूल दुरुस्ती अशी अन्य सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत. पालखी मार्गावर लावण्यात येणारे फिरते शौचालय तसेच कायमस्वरूपी शौचालय स्वच्छ ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तात्पुरत्या शौचालयाजवळ चिखल होऊ नये, तसेच पालखी मुक्काम स्थळी योग्य त्या ठिकाणी काँक्रीटीकरण व मुरमीकरण दिलेल्या वेळेत पूर्ण करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.